दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!

SSC HSC Result: आधी बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 23, 2024, 05:44 PM IST
दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट! title=
SSC HSC Result

SSC HSC Result: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. दहाव, बारावीच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालाशी संबंध जोडला जात आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे हे निकाल लागण्याच्या आधी दहावी-बारावीचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. आधी बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपे होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात आपल्या निकालासाठी सज्ज राहावे लागणार आहे. त्यांना आहे त्या ठिकाणावरुन त्यांचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट तसेच एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला हा निकाल कळू शकतो. 

कुठे पाहाल निकाल?

दहावी, बारावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी याची नेमकी तारीख अद्याप समोर आली नाहीय. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकावा लागेलय यानंतर निकाल तुमच्या समोर येईल.यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. बारावीसाठी एकूण 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.तर दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदाचा निकाल कसा लागतो? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

पालकांना उत्सुकता

कोणते बोर्ड निकालात बाजी मारणार? निकालाचा टक्का वाढणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. तसेच दहावी, बारावीनंतर काय करायचे? यासाठी पालक आपल्या विद्यार्थ्याची तयारी करुन घेत आहेत. अनेक समुपदेशक यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.